राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सुंदर मराठी भाषण rajmata ahilyadevi holkar jayanti
अहिल्याबाई हिल्याबाई होळकर म्हणजे तुम्हां आम्हां सर्वांच् मनात असणारी ती प्रतिमा की ज्यात सात्त्विकत सुशीलता, शीतलता, पवित्रता, पुण्याई चारित्र्यसंपन्नता, धर्मपरायणता ओतप्रोत भरलेली आहे निस्सीम शिवभक्तीने, हातात शंकराची पिंड घेतलेली जिच्या डोईवरचा पदर कधी ढळला नाही आणि काळजातला धीर कधी खचला नाही.
अशा या अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२० अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी या गावी झाला. वडील माणकोजी शिंदे तर आई सुशीलाबाई. गावातील ते एक सुसंस्कृत कुटुंब होते. श्रीमंत पेशवे थोरल्य बाजीरावांच्या पुढाकाराने इ.स. १७३३ मध्ये अहिल्य आणि खंडेराव यांचा विवाह थाटामाटात पार पडला. पुढे सासरे मल्हारराव होळकरांनी अहिल्येची बुद्धिमत्ता गुणवत्ता पाहून आपल्या मुलाच्या बरोबरीने सुनेलाही राज्य कसे चालवावे, घोडा कसा फेकावा, तलवार कशी चालवावी, तोफखाना कसा वापरावा, न्यायनिवाडा कसा करावा, लोकांना मदत कशी करावी, माणसे कशी पारखावीत, गनिमीकावा कसा करावा, धनुष्यबाण कसा चालवावा, भात्यामध्ये बाण कसे भरावेत यांसारख्या अनेक गोष्टींचे शिक्षण दिले. इसवी सन १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी अहिल्याबाईंना दोन मुलं होती. त्या सती जायला निघाल्या. पण सासऱ्यांच्या आग्रहाने त्या सती गेल्या नाहीत. पुढे काळाच्या ओघात सासुबाई गौतमीबाई, इ. स. १७६६ मध्ये सासरे मल्हारराव, मुलगा भालेराव व नातू नाथोबा, जावई यशवंतराव फणसे यांचे निधन झाले. मुलगी मुक्ता सती गेली. वैयक्तिक आयुष्य प्रचंड दुःखाचे असले, तरी तब्बल २९ वर्षे अहिल्याबाईंनी रयतेचे अश्रू पुसत एकहाती राज्य केले. ही त्या वेळच्या कालखंडात आणि पुरुषप्रधान व्यवस्थेत साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. दुःखाचे डोंगर समोर असतानाही रघुनाथराव पेशवे याचे आक्रमण अहिल्याबाईंनी मोठ्या चतुराईने परतवून लावले.’ मी हरली तर फारसा फरक पडणार नाही, पण आपण मराठी सत्तेचे अटकेपार झेंडे गाडणारे बाईकडून पराभूत झालात तर तुमची सर्वत्र अपकीर्ती, अवहेलना आणि कुचेष्टा होईल’ यातील राजकारण रघुनाथरावांच्या लक्षात येताच त्यांनी सैन्याला माघारी पाठवले व ‘मी युद्धाला नाही तर आपल्यावर आलेल्या दुःखाच्या सांत्वनाला येत आहे’ असा निरोप
पाठवला.
हे सर्व जरी असले तरी, आज तुम्हां आम्हां सर्वांना अहिल्याबाई आठवतात त्या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अखंड भारतामध्ये अहिल्याबाईंनी केलेल्या कार्याचे दाखले मिळतात. ठिकठिकाणी विहिरी, घाट, मठ, मंदिरे, पाणपोया, अन्नछत्रे, धर्मशाळा, संस्कार वर्ग, आश्रमशाळा, ग्रंथागार, यज्ञशाळा, तलाव हे सर्व लोकांच्या सोयी सुविधेसाठीच बांधलेले दिसतात. याशिवाय अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धारही त्यांनी केला. अहिल्याबाईंच्या या धोरणाचा परिणाम म्हणूनच माळवा प्रांतात शांतता, स्थैर्य, व्यापार, उद्योगधंद्यांचा विकास झाला. अहिल्याबाईंनी शेतीला प्राधान्य दिल्याने हा प्रदेश हिरवागार झाला. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ते सर्व बी-बियाणे व साहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले. धनसंपत्ती दिली नाही. पण कोणी उपाशी राहणार नाही याचीही काळजी घेतली. थोडक्यात अहिल्याबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच प्रजाहितदक्षतेने राज्य केले. देशभर रस्ते बांधले. कलकत्ता ते काशी असा हमरस्ता तयार केला. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. जगाला वंदनीय होईल असे कार्य केले. यातूनच असंख्य लोकांना रोजगार मिळाला. देशभरातील प्रतिभासंपन्न कारागिरांना महेश्वरीत आमंत्रित केले. महेश्वरी साडी उद्योग निर्मितीचे व विविध उद्योगाचे केंद्र बनले. विविध कलांना उत्तेजन दिले.
अहिल्यादेवींची राहणी अतिशय साधी होती. महेश्वरीत एका घोंगडीवर बसून त्या राज्यकारभार करीत. कोणत्याही प्रकारचा ऐषारामी डामडौल नव्हता. ही कामे करताना त्यांनी कधीही दौलतीचा म्हणजे सरकारचा पैसा वापरला नाही. सर्व खर्च हा होळकरांच्या खाजगीतील संपत्तीतून झालेला असे.
रोज पहाटे पाच वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होई तर संध्याकाळी उशिरापर्यंत कामे सुरू असत. या ३०० व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे व अंगीकारला पाहिजे.