15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण independence day marathi bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण independence day marathi bhashan 

“उत्सव तीन रंगांचा आकाशी आज सजला

नतमस्तक मी त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला”

आज आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी नम्रतेची विनंती करतो.

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य, आणि माझ्या तमाम छोट्या राष्ट्रभक्तांनो ! सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या… राष्ट्र गौरवदिनाच्या अनंत शुभेच्छा ! आज प्रत्येकाचे मन राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान व गर्व यांनी तुडुंब भरले आहे. माझ्या भारतमातेलाही आज जणू काही एक नव तेज, नवी झळाळी, नवा साज चढला आहे. हा दिवस इतर दिवसासारखा साधासुधा दिवस नाही. आपल्या सुराज्याचा, आपल्या स्वराज्याचा आपल्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ करणारा सुवर्णदिन आहे.

या पवित्रदिनी आणि या मंगलक्षणर्णी गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या आपल्या भारतमातेचा कण अन् कण आपल्या पराक्रमाची गाथा आणि कथा आपल्या लेकरांना सांगण्यासाठी जणू आज सादच घालत असावा. या उल्हासात, या उत्साहात, आणि या हर्षात मीही भिजून चिंब झालोय ! आणि म्हणूनच युगानुयुगे स्वातंत्र्यलढ्याचे आणि राष्ट्राचे प्रतिक असणाऱ्या या तिरंग्याला वंदन करून चार शब्द बोलावेत यासाठी आज आतूर झालोय !

१५ ऑगस्ट, १९४७ च्या मध्यरात्री १२ वाजता… घडाळ्यात १२ चे टोल वाजले, अन् समस्त देशवासीयांच्या काळजाचा जणू ठोकाच् चुकला ! शेकडो वर्षांनी माझा देश गुलामीच्या शृंखला तोडून मुक्त झाला ! याच दिवशी एका नव्या युगाचा, एका नव्या पर्वाचा,

एका लोकराज्याचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. म्हणूनच तो क्षण, ती रात्र अन् तो दिवस संपूर्ण भारतीय इतिहासात सर्वात मौल्यवान आहे. यासाठीच आपण दरवर्षी हा दिवस एक राष्ट्रीय सण…एक राष्ट्रीय उत्सव म्हणून मोठ्या दिमाखात साजरा करत आलोय अन् साजरा करत राहणार ! ज्या डौलाने, ज्या सन्मानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी तिरंगा फडकत होता, आजही त्याच डौलाने, त्याच सन्मानाने माझा तिरंगा गगनात फडकत आहे. म्हणून तर माझे मन आज म्हणते,

“उत्सव तीन रंगाचा, पहा नभात कसा आज सजला | नतमस्तक मी त्या सर्वांच्या, ज्यांनी भारत घडवला ।”

आज या सौभाग्यदिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लहानापासून थोरापर्यंत, सर्व जातीधर्माचे अबालवृद्ध हा स्वातंत्र्याचा सोहळा राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन साजरा करत आहेत… ‘भारत माता की जय !’ असा गगनभेदी जयघोष करत आहेत. हा स्वातंत्र्यदिनू म्हणजे….देशाच्या उदयाचे, विकासाचे, व उन्नतीचे एक पर्व आहे ! अन् आम्हां सर्वांना यावर नक्कीच गर्व आहे !

पण केवळ जयघोष करून आपली जबाबदारी संपत नाही. या देशाला बलशाली बनवण्याचे दिव्य स्वप्न आपणास साकार करावयाचे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका आणि कर्तव्ये आपणास पार पाडायची आहेत आणि हे जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने समर्पणाचे आणि स्वातंत्र्याचे चीज झाले असे आपणास म्हणता येईल.

सरतेशेवटी, या शुभप्रसंगी देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या… महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू यासारख्या अनेक महान विभूतींना त्रिवार वंदन ! भारतमातेचे पांग फेडण्यासाठी आपल्या प्राणाचे हसतमुखाने बलिदान करणारे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यासारख्या सर्व वीरपुत्रांना श्रद्धांजली ! शिवाय देशाच्या सीमेवर निधड्या छातीने डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रसंगी वीरमरण प्राप्त झालेल्या सर्व भारतीय जवानांना प्रणाम !

शेवटी जाता जाता आपल्या देशासाठी, देशाच्या सामर्थ्यासाठी आपल्या सर्वांना एकतेने राहण्याचे आवाहन करतो कारण,

“अनेकता में एकता इस देश की शान है। इसीलिए गर्व से कहता हूं मेरा भारत महान है।”

जय हिंद ! जय भारत

Related posts:

Leave a Comment