राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत anandadayi shanivar paripatrak
संदर्भ :
– १) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१२६/एसडी-४, दिनांक १४ मार्च, २०२४.
२) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३०५/ एसडी-४, दिनांक १ ऑक्टोबर, २०२५
प्रस्तावना :-
विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, स्वयंशिस्त, सहकार्याची वृत्ती, नेतृत्वगुण यांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा ‘आनंददायी शनिवार’ म्हणून साजरा करण्यात यावा अशा सूचना संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. सदर उपक्रमाचा विस्तार करण्यात येऊन, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता, विद्यार्थ्यांच्या इच्छुकतेनुसार करावयाच्या अतिरिक्त कृती कार्यक्रमांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा उद्देश तसेच त्या अंतर्गत करावयाच्या कृती याविषयी संदर्भ क्र. १ येथील परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय मूल्य आधारित उपक्रमांची ओळख करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, सामाजिकता, व्यावहारिक कौशल्ये आणि नेतृत्व गुण विकसित करणे या उद्देशाने ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाअंतर्गत खालील अतिरिक्त नावीन्यपूर्ण कृतींचा शालेय स्तरावर समावेश करण्यात यावा.
१) पालक मेळावा :
वर्षातून किमान दोन वेळा पालक मेळावे घेण्यात यावेत.
मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच भावनिक, सामाजिक व करिअर संबंधी
मार्गदर्शन करणे हा असावा.
पालकांना विद्यार्थ्यांशी संवादासाठी उपयुक्त विषय द्यावेत. उदा.
> मुलांचे स्क्रीन टाईम नियंत्रण
> अभ्यासाची सवय
> किशोरवयातील बदल
> मानसिक आरोग्य
> पालक-शाळा भागीदारी
लघु उद्यम महोत्सव / विज्ञान प्रदर्शन / कला प्रकल्प यासारखे उपक्रम आयोजित करता येतील.
२) स्नेहसंमेलन :
वर्षातून एकदा शाळास्तरीय सांस्कृतिक स्नेहसंमेलन आयोजित करावे.
सर्व विद्यार्थ्यांना रंगभूमी, क्रीडा कौशल्ये, कलाविष्कार याबाबत संधी मिळेल याची दक्षता घ्यावी.
कार्यक्रमामध्ये लोककला, लोकनृत्य, नाटिका, एकांकिका, कवी संमेलन, वाद्यकला, चित्रप्रदर्शन यांचा समावेश असावा.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहन द्यावे.
३) देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, योगा, व्यायाम, सैनिकी प्रशिक्षण, एन.सी.सी / स्काऊट गाईड
धर्तीवर परेड :
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने देशभक्तीपर गाण्यांवर विद्यार्थ्यांच्या कवायती आयोजित कराव्यात.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, एकता यासारखे गुण वाढीस लागावेत याकरिता विद्यार्थ्यांना सैनिकी
प्रशिक्षण द्यावे; तसेच एन.सी.सी / स्काऊट गाईडच्या धर्तीवर विद्यार्थ्यांची परेड आयोजित करावी.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी त्यांच्याकडून योगासने, व्यायाम व तत्सम शारीरिक कसरती करून घ्याव्यात.
४) माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन :
शासन परिपत्रक संदर्भ क्र. २. दि. १ ऑक्टोबर, २०२५ अन्वये, शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे. शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत.
विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी असलेल्या माजी विद्यार्थ्यांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत. उदा.
>
करिअर मार्गदर्शन
>
स्पर्धा परीक्षा
कला, क्रीडा, विज्ञान
जीवन कौशल्ये
अशा मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थी प्रेरित होऊन, त्यांना त्यांच्या करिअर निवडीस मदत होईल,
हे पहावे.
५) शैक्षणिक सहली (स्थळभेट) :
स्थानिक परिसरातील किल्ले, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, उद्योग, संग्रहालये इ. ठिकाणांना वर्षातून किमान एकदा सहल आयोजित करावी.
सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाविषयी संक्षिप्त माहिती दिली जावी.
सहलीनंतर विद्यार्थ्यांकडून अहवाल लेखन, प्रस्तुतीकरण आणि चित्रदर्शिका प्रकल्प तयार करून घ्यावेत.
आयोजित सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षितता याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.
६) क्षेत्रभेट (राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित अनुभवजन्य शिक्षण) :
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्याध्यर्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण (Experiential Learning) देणे आवश्यक आहे.
याअनुषंगाने, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता पोस्ट ऑफिस, बँका, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, ऐतिहासिक स्थळे, स्थानिक उद्योग इत्यादी ठिकणांना क्षेत्रभेटीचे नियोजन करावे.
अशा क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून, विद्यार्थ्यांमध्ये विविध कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, सार्वजनिक सेवा, दस्तऐवजीकरण, व्यवहार कौशल्य याविषयी समज विकसित होईल, हे पहावे.
७) वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन :
प्रत्येक शाळेत वर्षभरात किमान ३ विषयांवर वक्तृत्व / कथा सांगणे / वादविवाद किंवा काव्यपठण स्पर्धाचे आयोजन करावे.
विषय निवडताना देशभक्ती, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक मूल्ये, लोकशाही, तंत्रज्ञान, आरोग्य, स्वच्छता इ. विषय प्राधान्याने समाविष्ट करावेत.
विद्यार्थ्यांना मौलिक भाषण, मराठी भाषेची शुद्धता, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, वेळेचे नियोजन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा.
विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन द्यावे.
८) लघु उद्यम महोत्सव (व्यवसाय शिक्षण उपक्रम) :
विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये, पैशाचे व्यवस्थापन, मोलभाव, विक्री कौशल्य आणि ग्राहक वर्तन समजणे यासाठी हा उपक्रम राबवावा.
विद्यार्थी स्वतः भाजीपाला, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्य पदार्थ, पुस्तकांची देवाणघेवाण, पुनर्वापर साहित्य इ. वस्तूंची छोटी दुकाने लावतील.
विद्याथ्यर्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा, लेखापद्धती याबाबत प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव द्यावा.
शक्य असल्यास हा उपक्रम आणि पालक मेळावा एकाच दिवशी आयोजित करावा.
२ वरील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सामाजिक जाणीव, शारीरिक-मानसिक विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यावहारिक जीवन कौशल्ये विकसित होतील.
३. प्रत्येक शाळेने या सर्व उपक्रमांची वार्षिक अंमलबजावणी रूपरेषा तयार करून कार्यवाही अहवाल
जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेकडे सादर करावा.
४ तसेच आयुक्त (शिक्षण) यांनी विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून द्यावी आणि शाळांनी
या उपक्रमांची माहिती या लिंकवर भरावी.
५. ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत, उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम/घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील; परंतु, आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम/घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरिता ऐच्छिक राहील.
६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१२०९१८२३१७६१२१ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने










