समग्र शिक्षा व PM SHRI योजनेंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन २०२६-२७ साठी पुस्तकांची स्तर व माध्यमनिहाय निर्मिती करणेबाबत pmshri samagra shiksha paripatrak
विषय : समग्र शिक्षा व PM SHRI योजनेंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन २०२६-२७ साठी पुस्तकांची स्तर व माध्यमनिहाय निर्मिती करणेबाबत…
संदर्भ :
१. समग्र शिक्षा PAB केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे इतिवृत्त सन २०२६-२७
२. PM SHRI PAB केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे इतिवृत्त सन २०२६-२७
३. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांच्याशी झालेली चर्चा दि.०८/०७/२०२६
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सन २०२४-२५ मध्ये प्रस्तुत कार्यालयाच्या प्रसारमाध्यम विभागामार्फत समग्र शिक्षा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रंथालय उपक्रमासाठी मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यम पुस्तकांची छपाई करून राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आले होते.
मागील वर्षीप्रमाणे सन २०२६-२७ मध्ये प्रस्तुत कार्यालयाच्या प्रसारमाध्यम विभागामार्फत समग्र शिक्षा (स्तर १ ते ५ आणि ६ ते ८) व PM SHRI (स्तर १ ते ५,६ ते ८, ९ ते १० आणि ११ ते १२) योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रंथालय उपक्रमासाठी मराठी, उर्दू, हिंदी व इंग्रजी या चार माध्यमातील पुस्तकांचे विकसन, छपाई करून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विविध माध्यमांच्या शाळांना ग्रंथालय पुस्तके वितरीत करण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यार्थी/शाळा स्तरानुसार साहित्य प्रकार/थीम्सनुसार ग्रंथालय पुस्तकांची निर्मिती करणे अपेक्षित आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
अ) लेखकांची निवड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियमित अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी स्तरनिहाय (१ ते ३), (४ ते ५), (६ ते ८), (९ ते १०), (११ ते १२), माध्यमनिहाय (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू) निवडक शाळांच्या ग्रंथालयांसाठी पूरक वाचनाची पुस्तके तयार करून घेण्यासाठी लेखकांची निवड करावी. (सेवानिवृत्त असणारे तसेच लेखन साहित्य सादर करावयाच्या अंतिम तारखेपूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्याचा समावेश करू नये.)
ब) जिल्हास्तर बैठक : निवड केलेल्या लेखकांची दिनांक १५ जुलै, २०२६ पर्यंत स्वतंत्र बैठक घेवून सदर पुस्तक निर्मितीबाबत व हेतूबाबत आपल्या स्तरावरून मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे देण्यात याव्यात.
१. स्तरनिहाय/माध्यमनिहाय विद्यार्थी वयोगटानुसार नाविन्यपूर्ण विषयावर आधारीत व यापूर्वी प्रकाशित न केलेले पुस्तक या स्वरूपात जबाबदारीने लेखन करण्यात यावे. वादग्रस्त/आक्षेपार्ह मजकूर टाळावा. पुस्तक लेखन हे पूर्णतः स्वनिर्मित असावे.
२. Margins (Left-१.५”, Other Side-१”), १.५ Line spacing या स्वरूपामध्ये Type करून MS Word File व PDF अशा दोन्ही स्वरूपातील पुस्तके जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावीत. तसेच त्या पुस्तकाच्या दोन हार्ड कॉपी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला जमा करून त्याची पोहोच घ्यावी.
३. पुस्तकांचे लेखन करत असताना आवश्यक चित्रे, मजकूर, लिहित असताना मुलांना ते पुस्तक आवडीचे व आनंदायी वाटावे तसेच कॉपी राईट मुक्त मजकूर, चित्रे इत्यादींचा समावेश करण्याबाबत योग्य ती दक्षता लेखकांनी घ्यावी. पुस्तकाच्या प्रतीमध्ये सर्व चित्रे, तक्ते आणि मजकूर जसा पुस्तकात दिसणे अपेक्षित आहे तशी रचना करून ती प्रत आवश्यक बाबींसह सादर करावी.
४. सदर लेखन कार्य पूर्ण करून प्रती जमा करण्यासाठी ३१ ऑगस्ट, २०२६ पर्यंतची मुदत देण्यात यावी.
५. इयत्ता १ ते ३ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार अशा किमान पाच पुस्तकांची निर्मिती १६ पृष्ठे या प्रमाणात केली जाईल.
६. इयत्ता ४ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार अशा किमान पाच पुस्तकांची निर्मिती ३२ पृष्ठे या प्रमाणात केली जाईल.
७. इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार अशा किमान पाच पुस्तकाची निर्मिती ४८ पृष्ठे या प्रमाणात केली जाईल.
८. इयत्ता ९ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार अशा किमान तीन पुस्तकाची निर्मिती ५६ पृष्ठे या प्रमाणात केली जाईल.
९. इयत्ता ११ ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार अशा किमान एका पुस्तकाची निर्मिती ८० पृष्ठे या प्रमाणात केली जाईल.
१०. याचाच अर्थ प्रत्येक जिल्ह्यातून उपरोक्त पाच स्तरासाठी जिल्हा निवड समितीमार्फत निवडक अशी एकूण १९ पुस्तके (सर्व माध्यमांचा समावेश) राज्यस्तरावर पाठविणे अपेक्षित आहे.
११. सदर विभागणी करताना उपलब्ध लेखकांची संख्या, पुस्तकांची संख्या, पृष्ठांची संख्या लक्षात घेवून एक किंवा अधिक लेखक एका पुस्तकाची निर्मिती करू शकतात अशा पध्दतीने वाटप करण्यात यावे तसेच एका लेखकाचे कोणत्याही एका स्तरासाठी/माध्यमासाठी एकच पुस्तक स्विकारण्यात येईल.
१२. या पुस्तकांची निर्मिती करताना सर्व साधारणपणे कथा, कविता, सा. ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, छोटी चरित्रे, प्रवासवर्णने, आरोग्य व सुरक्षितता, अभ्यास सवयी, विविध शैक्षणिक अॅप्स, गती वाचन व आकलन, स्पर्धा परीक्षा, सृजनात्मक लेखन, कला क्रीडा, AI इत्यादी विषयांबरोबरच विद्यार्थ्यांना उपयुक्त असा कोणताही विषय निवडून लेखकांना लेखन करता येईल.
१३. राज्यस्तरावर राज्य निवड समितीद्वारा ज्या पुस्तकांची अंतिम निवड होईल फक्त त्याच पुस्तकासाठी लेखकांकडून सर्व हक्क परिषदेच्या स्वाधीन केल्याबद्दल तसेच लिहीलेला मजकूर कॉपी राईट मुक्त असलेबाबतचे शपथपत्र (करारनामा) घेतले जाईल.
१४. अशा लेखकांना त्यांनी तयार केलेल्या पुस्तकांचा दर्जा, स्तर, नाविन्यपूर्णता, पृष्ठ संख्या इत्यादीबाबी लक्षात घेवून बक्षिस स्वरूपात योग्य ते मानधन दिले जाईल.
१५. सदर उपक्रमाचा उद्देश शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांच्यातील प्रतिभासंपन्न लेखकास संधी देणे हा आहे. ही सर्व पुस्तके राज्यातील सुमारे २५,००० शाळांमध्ये वितरण होणार आहे.
क) जिल्हा पुस्तक निवड समिती: जिल्हास्तरावर इच्छुक लेखकांना स्तरनिहाय, माध्यमनिहाय पुस्तके तयार करून घेतली जावीत तद्नंतर जिल्हास्तरावर मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली खाली दिलेल्या रचनेप्रमाणे समितीची स्थापना करावी.
उपरोक्तप्रमाणे जिल्हा पुस्तक निवड समितीची स्थापना करून ब मधील मुद्दा क्र. ५ ते ९ मध्ये दर्शविल्याप्रमाणे दर्जेदार पुस्तकांची निवड करून दि.१५ सप्टेंबर, २०२६ पर्यंत अशी पुस्तके हस्तेपोहोच प्रसारमाध्यम विभाग, प्रस्तुत कार्यालयाकडे जमा करावीत. सोबत १) जिल्हा पुस्तक निवड समितीचे इतिवृत्त, २) निवड झालेल्या पुस्तकांची प्रत्येकी एक HARD COPY आणि Soft Copy, ३) लेखक व पुस्तकांची यादी प्रपत्र अ, ४) प्रपत्र-व (प्रत्येक पुस्तकांच्या बाबतीत स्वतंत्रपणे) ५) लेखकाने विहित नमुन्यात दिलेला अर्ज आणि ६) हमीपत्रे जमा करून राज्यस्तरावर सादर करावीत.
याबाबत जिल्हास्तरावर पुस्तकांची निवड करताना प्रपत्र व मधील दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
ड) राज्यस्तर पुस्तक निवड समिती: जिल्हास्तरावरून प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून उपलब्ध निधी व अपेक्षित पुस्तक संख्या यास अनुसरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारे समिती स्थापन करून दर्जेदार व योग्य पुस्तकांची निवड करण्यात येईल. अशा लेखकांना पुनश्च परिषदेत बोलावून पुस्तके अंतिम करण्याबाबत संपादन कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. त्यांनी पुस्तक छपाईपर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य परिषदेस करणे बंधनकारक राहील.
उपरोक्तप्रमाणे समग्र शिक्षा आणि PM SHRI ग्रंथालय उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण व दर्जेदार पुस्तकांची निर्मिती, छाननी आणि समितीद्वारे निवड करून सदर पुस्तके दिलेल्या विहित कालावधीत राज्यस्तरावर पाठविण्याची जबाबदारी आपणांवर राहील याची नोंद घ्यावी.
सोबत : १) प्रपत्र-अ, २) प्रपत्र-ब, ३) विहित नमुन्यातील अर्ज
, ४) हमीपत्र नमुना










