“अनुकरण” मराठी बोधकथा marathi bodhkatha
अनुकरण
भगवान बुद्ध आपल्या सर्व शिष्यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्यांचा ‘वक्कली’ नावाचा शिष्य आजारी पडला. काही दिवस भिक्खूंनी त्याची देखभाल केली; परंतु तो ठीक झाला नाही. एक दिवस ‘वक्कली’ आपल्या एका भिक्खू मित्राला म्हणाला, “भगवान बुद्धांचे दर्शन करायचे आहे. त्यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. तसेच शरीरालाही ठीक व्हायला वेळ लागणार नाही.” बुद्धांपर्यंत ‘वक्कली’च्या अवस्थेचा आणि इच्छेचा संदेश पोहोचला. तेव्हा ते ताबडतोब त्याला भेटायला आले.
भगवान बुद्ध येत असताना दुरूनच वक्कलीने पाहिले आणि त्यांच्या सन्मानार्थ तो पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. बुद्धांनी त्याला उठू न देता प्रेमाने म्हटले, “मला खाली बसण्यासाठी आसन आहे. तुम्ही उठण्याची गरज नाही.” ‘वक्कली’ने गहिवरून म्हटले, “मला तुमचे दर्शन करण्याची मोठी आस लागली होती. ती आज पूर्ण झाली.” बुद्ध म्हणाले, “वक्कला, जसा वेगवेगळ्या अशुद्धीने भरलेला तुझा देह आहे, तसाच माझाही देह अशुद्धीनेच भरलेला आहे. तेव्हा देहाकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष दया. आपण समाजासाठी काय करू शकतो, याचा विचार करा.” भगवान बुद्धांनी यांतून हेच सांगितले की व्यक्तिपूजेपेक्षाही सिद्धांताला महत्त्व दया.









