महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार educational thoughts on mahatma gandhi 

महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार educational thoughts on mahatma gandhi 

ज्या शिक्षण व्यवस्थेतून जबाबदार नागरिकाची निर्मिती होते त्या व्यवस्थेवरच गांधीजींनी लक्ष केंद्रित केले. देशाची प्रगती साधायची असेल तर त्या प्रगतीचा आत्मा म्हणजे शिक्षण होय. या त्यांच्या विचारातून शिक्षणाबद्दलची त्यांची आस्था स्पष्ट होते.

महात्मा गांधीजींना शिक्षणाची खूप महत्त्वाची जाणीव होती. त्यांना वाटायचे की चांगले नागरिक घडवण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. देशाची प्रगती होण्यासाठी शिक्षण हेच मुख्य साधन आहे, असे त्यांचे ठाम मत होते. गांधीजी हे फक्त स्वातंत्र्यसैनिकच नव्हते, तर ते समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञही होते. शिक्षणाबाबत त्यांचे विचार खूप स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण होते.

गांधीजींच्या मते, मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे आणि त्यांच्या मातृभाषेतच मिळायला हवे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यात शारीरिक श्रमाचाही समावेश असावा, असे त्यांचे मत होते. त्यांनी विणकाम, शेती, सुतकताई, बागकाम, हस्तकला यांसारख्या क्रियाशील गोष्टी शिक्षणात समाविष्ट केल्या पाहिजेत, असे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःहून पैसे कमवण्याची क्षमता वाढेल.

गांधीजी स्वच्छतेला खूप महत्त्व देत असत. त्यांना वाटायचे की शरीर, शाळा आणि परिसर – सगळीकडे स्वच्छता हवी. शिक्षणामध्ये ही सवयही लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी स्वतःही रोज कष्टाची कामे केली आणि विद्यार्थ्यांनाही श्रमाचे महत्त्व कृतीतून शिकवले. त्यांना वाटायचे की कोणतेही काम लहान-मोठे नसते.

शिक्षण हे नैतिकता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य घडवण्यासाठी असले पाहिजे, असे गांधीजी मानत. मुलांना शिकवताना त्यांची आवड लक्षात घेऊन उपक्रम द्यावे, म्हणजे त्यांना शिक्षण आनंददायी वाटेल. फक्त अभ्यासक्रम न शिकवता त्यांच्यातील कौशल्ये, कला आणि आत्मविश्वास वाढवणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट असावे.

गांधीजींच्या मते, शिस्त ही बाहेरून लादू नये, तर ती मुलांनी स्वेच्छेने अंगी बाणवली पाहिजे. सदाचार, संयम, सहिष्णुता, आत्मनिर्भरता आणि सत्याग्रह यासारखे गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा होती.

शिक्षणामुळे मुलांचा मानसिक, भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यावर गांधीजींचा भर होता. शिक्षण त्यांच्या सामाजिक वातावरणाशी सुसंगत असावे, जेणेकरून त्यांना समाजाबद्दल जाण आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल. भारतीय संस्कृतीची ओळख शिक्षणातून मिळाली पाहिजे, असेही गांधीजी मानत.

त्यांनी शिक्षणात अनुभवाला खूप महत्त्व दिले. अनुभवातून शिकलेले ज्ञान अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे असते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीतून शिकण्याची संधी मिळावी, असे गांधीजी म्हणत.

१९११ पासून गांधीजींनी भारतात व परदेशात अनेक शैक्षणिक प्रयोग केले. ‘बुनियादी शिक्षण’, ‘जीवन शिक्षण’, ‘वर्धा शिक्षण’ अशा नावांनी त्यांच्या शिक्षणपद्धती ओळखल्या जातात. या पद्धतींमध्ये शारीरिक श्रम, उद्योग, सहकार्य, संयम, सामाजिक जाणीव आणि उद्योजकतेवर भर दिला जातो. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही, तर समाजहितासाठीही व्हावा, असे त्यांना वाटे.

प्रौढ शिक्षणालाही गांधीजी महत्त्व देत. त्यांनी सांगितले की प्रौढ लोकही शिकले पाहिजेत, म्हणजे ते अधिक स्वावलंबी बनतील आणि त्यांच्या अडचणी सोडवता येतील. शिक्षण हे केवळ अक्षर ओळखण्यासाठी नसावे, तर व्यवहारिक ज्ञान देणारे असावे.

गांधीजींना स्त्रियांचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे वाटत असे. स्त्रियांना समान संधी मिळाली, तर समाज अधिक प्रगत होईल, असा त्यांचा विश्वास होता. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या गरजा, आवडी, कल आणि क्षमता लक्षात घेऊन असावे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता फक्त गुणांच्या आधारावर न ठरवता त्यांच्या चारित्र्यावर भर द्यावा.

गांधीजींनी सांगितले की शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असावा. फक्त पुस्तक शिकवणे हा शिक्षकाचा हेतू नसावा, तर त्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार आणि मूल्ये रुजवावी. प्रत्येक मुलाची गरज वेगळी असते, म्हणून शिक्षकाने त्याला समजून घेतले पाहिजे.

गांधीजी म्हणायचे की विद्यार्थी चुका करतात, पण त्यामुळे त्यांना शिक्षा देणे योग्य नाही. शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे आणि विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी द्यावी.

विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे कारण तेच उद्याचे नागरिक आहेत. त्यांनी जात, धर्म, अस्पृश्यता यांचा त्याग करावा. स्वच्छता राखावी, समाज उपयोगी काम करावे, नवीन ज्ञान मिळवून ते इतरांसाठी वापरावे, व्यसनांपासून दूर राहावे – अशा अनेक गोष्टी गांधीजींनी विद्यार्थ्यांसाठी सांगितल्या.

आज बेरोजगारी वाढलेली असताना गांधीजींचे कार्याभिमुख शिक्षणाचे विचार अत्यंत योग्य ठरतात. 2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिले आहे, यावरून गांधीजींचे विचार किती दूरदृष्टीचे होते हे लक्षात येते.

गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा सन्मान केला पाहिजे आणि त्या विचारांचा समाजात प्रसार करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे.

 

Leave a Comment