“समाधान हेच खरे धन !” मराठी बोधकथा marathi bodhkatha
समाधान हेच खरे धन !
एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते; तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली होती. तो त्यांच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. “मला सात पिढ्या पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,” अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला न्याहाळले व ते म्हणाले, “तुझ्या घराजवळ एक झोपडी आहे. त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.”
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, “तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्याचा स्वीकार व्हावा.”
म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, “आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाट्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.” मग आपण उदयासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.” श्रीमंत माणूस उद्गारला.
अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, “आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उदयाची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.” ते ऐकून श्रीमंत माणूस चकितच झाला. उदयाची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढ्यांची काळजी करणारा मी कोठे? असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.










