भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी शैक्षणिक विचार निबंध/ भाषणासाठी उपयुक्त educational thoughts of bharatratna do babasaheb ambedkar
“वाचाल तर वाचाल” हा अमूल्य विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जनतेला दिला. कारण ज्ञान व वाचन यांचा जवळचा संबंध आहे. हे त्यांना जाणवले होते. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. तसे पाहिले तर, प्राचीन काळापासून वाचन संस्कृतीला
महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
“वाचाल तर वाचाल, ज्ञानी गुणवंत बनाल, जग जिंकाल, आपले ध्येय गाठाल.” आपल्या रोजच्या जीवनात वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण वाचन हे एकमेव असे माध्यम आहे, ज्यातून ज्ञान, विचार, एकाग्रता वाढते. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा देखील ज्ञानाची श्रीमंती खरी मानली जाते. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही. पण ज्ञानाचे तसे नसते. ज्ञान हे वृद्धीगत होत जाते. वाचनाने केवळ ज्ञानच नाही तर आपण जी भाषा बोलतो त्यावरही त्याचा प्रभाव पडतो.
आजच्या स्पर्धेच्या जगात जर आत्मविश्वासाने, खंबीरपणे उभे राहायचे असेल तर वाचन हे शस्त्र महत्त्वाचे आहे. अध्ययन-अध्यापना मध्ये वाचनाला महत्त्व आहे. वाचनाला वयाची मर्यादा नसते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण वाचनाची आवड जोपासू शकतात.
वाचनामध्ये केवळ पाठ्यपुस्तकांचाच समावेश होत नाही तर वर्तमानपत्र, कथा-कादबंऱ्या, गोष्टींची पुस्तके, अशा अनेक गोष्टी आपण वाचू शकतो. लहान मुलांसाठी तर बडबडगीते, पऱ्यांच्या गोष्टी, रहस्यकथा, सुविचार, म्हणींवरुन गोष्टी असे अनेक ज्ञानाचे दरवाजे उघडलेली पाहायला मिळतात. या वाचनाने लहान मुलांचा मानसिक व बौद्धिक विकास व्हायला मदत मिळते. मुलांचे व्यक्तिमत्त्व उंच पातळीवर पोहोचते.
वर्तमानपत्र वाचनाचा अनेकांना कंटाळा येतो. पण जर आपण वर्तमानपत्र वाचले नाही तर आपल्याला सभोवतालच्या घडामोडी समजणार नाही. तसेंच समाज, देश यांची प्रगती कळणार नाही. नोकरीविषयक गोष्टी कळणार नाही. वर्तमानपत्रामुळे सामाजिक, राजकीय, भौगोलिक, शैक्षणिक, आर्थिक अशा अनेक क्षेत्रांची माहिती मिळते.
“वाचन करुया, ज्ञान मिळवूया”, आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपले पाय घट्ट रोवायचे असतील तर वाचनाला आपला मित्र बनवा.
आपल्याला प्रेरणा देणारे संतसाहित्य, राजे-महाराजे यांच्या लढाईच्या गोष्टी, शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, गरीबीतून आलेले लोक, ज्यांनी या देशासाठी प्राण अर्पण केले व आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले या सर्व साहित्य वाचनाची आजच्या पिढीला गरज आहे.
सर्व क्षेत्रातील पुस्तके वाचल्याने आपले प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान वाढण्यास मदत होते. ज्ञान वाढले की, आत्मविश्वासही वाढतो, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती बळावते.
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात टेलिव्हिजन, मोबाईल, संगणक, चिटपत्रगृह, पंचतारांकित हॉटेल, विविध क्लास, इंटरनेट कॅफे या माध्यमांनी पुस्तकांची जागा घेतली आहे. लहान विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा टि.व्ही वरील कार्टून शो व रियालिटी शो चे जास्त आकर्षण वाटते. आजची तरुण पिढी परीक्षेच्या काळातही क्रिकेटचे थेट प्रक्षेपण पाहण्यात वेळ वाया घालविते व स्वतःचे नुकसान करुन घेतात.
धकाधकीच्या व गतिमान जीवन शैलीमुळे लोकांना अवांतर वाचनाला वेळच मिळत नाही. वाचनालयापेक्षा चित्रपटगृहात लोकांची गर्दी वाढत आहे. आजच्या तरुण पिढीला वाचनाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.
जर वाचनाचे महत्त्व कमी झाले तर संस्कृती टिकणार नाही. मुलांचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर रोज एक तास अवांतर
वाचनाची सवय लावा. वाचनाच्या आवडीने त्यांची शब्दसंपत्ती तर वाढेलच शिवाय लिहीलेल्या मजकूर व त्याचा अर्थ ही समजायला मदत मिळेल.
पुर्वीच्या लोकांना बऱ्याच गोष्टीं लक्षात राहायच्या. त्याचे कारण वाचनच होते. कारण तेव्हा कोणतेच साधन नव्हते. शाळेमध्ये शिकविले जाणारे लगेच वाचून तोंडपाठ करायचे. इतकेच त्यांना माहित होते. म्हणून आजही त्यांना ऐतिहासिक लढाया, भूगोलाचे नकाशे, मराठी साहित्य, लेखक, कवी, कविता मूखोद्गत आहेत.
“आजपासून एकच ध्यास, वाचनाचा लाभो सहवास.”