राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती पसंतीक्रम देण्यास ११ ऑगस्टपर्यंत मुदत shikshak bharti pavitra portal
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला असून ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगरपालिका/परिषदांच्या २८० तसेच खासगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ आणि शासकीय विद्यानिकेतन मधील ५६ अशा एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे. यामधील १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय तर खासगी संस्थांमधील १०,३२८ पदे मुलाखतीसह भरावयाची आहेत.
या रिक्तपदांमध्ये पहिली ते पाचवीच्या १४ हजार ३२० पदांचा, सहावी ते आठवीच्या १०,०१२ पदांचा, नववी व दहावीच्या पाच हजार ५१३ पदांचा तर ११ वी व १२ वीच्या ३६४ पदांचा समावेश करण्यात आला आहे.
किती पदे भरणार यावरून गोंधळ?
रिक्तपदांच्या ८० टक्के पदे भरली जातील, त्यामुळे ही भरती प्रक्रिया २४ हजार पदांसाठी होईल, असे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. तर शासकीय प्रसिद्धीपत्रकानुसार ही भरतीप्रक्रिया ३० हजार पदांसाठी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नेमकी किती पदे भरली जाणार, यावरून गोंधळ आहे.
सूचना काय आहेत ?
उमेदवारांना पदभरतीसाठी संकेतस्थळावर प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी आवश्यक सुविधा ६ ऑगस्ट २०२६ पासून देण्यात आली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.











