शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना promotion guidelines paripatrak
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक. एसएसएन-२०११/प्र.क्र.४४/टीएनटी-२, दिनांक ०६ फेब्रुवारी, २०१२.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक शालार्थ – १११८/प्र.क्र.३०/ टीएनटी-३, दि.१० जून, २०२२
प्रस्तावनाः राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये तसेच विद्या निकेतने इ. संस्थामध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती झाल्यानंतर सदरहू भरती योग्य व नियमानुसार तसेच याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने योग्य आहे किंवा कसे, ही तपासणी करुन वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याबाबतची कार्यपध्दती संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दि.०६.०२.२०१२ अन्वये निश्चित करण्यात आली आहे. तसेच सर्व व्यवस्थापनांच्या संस्थांमधील नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करणे व शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ येथील दि. १०.०६.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०१२ मधील मुद्दा क्रमांक अ (४) मध्ये “सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पद भरण्याची कार्यवाही २ महिन्यांच्या आत करणे बंधनकारक राहील” ही अट समाविष्ट करण्यामागे शैक्षणिक संस्थांनी एकदा जाहिरातीची परवानगी मिळवल्यानंतर ती प्रक्रिया अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू नये, शाळांना वेळेत शिक्षक मिळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे व तात्काळ शिक्षक उपलब्ध करणे व परवानगीचा गैरवापर टाळणे, विशिष्ट उमेदवारांसाठी जाहिरात दीर्घकाळ प्रलंबित न ठेवणे आणि संपूर्ण निवड प्रक्रिया एका निश्चित कालावधीत पारदर्शकपणे पूर्ण करणे हे प्रमुख उद्देश / प्रयोजन होते.
तथापि, उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामकाजात जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून पद भरण्याची कार्यवाही २ महिन्यांच्या आत करताना व्यावहारिक अडचणी (टपाल/जावक विलंब, अर्ज मुदत व पडताळणी, मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी, प्रशासकीय मान्यता व रुजू कालावधी) येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०१२ मधील तरतुद क्रमांक अ (४) मधील अटीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
शासन निर्णय दिनांक ०६ फ़ेब्रुवारी, २०१२ मधील तरतुद क्रमांक अ (४) मधील “सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पद भरण्याची कार्यवाही २ महिन्यांच्या आत करणे बंधनकारक राहील.”
ऐवजी
“सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पद भरण्याची कार्यवाही ३ महिन्यांच्या आत करणे बंधनकारक राहील.”
असे वाचावे.
३. उपरोक्त निर्देश वगळता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ०६ फेब्रुवारी, २०१२ मधील उर्वरित सर्व निकष/आदेश आहेत तसेच लागू राहतील.
४. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०८०४१६४८०८५६४९ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










