राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जबरदस्त मराठी भाषण rajmata jijau jayanti
सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच माझे गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच् वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. जिच्या चरणाची धुळ कुंकवाच्या करंड्या भरून माथी धरावी अशा राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती आपल्या शाळेमध्ये आपण साजरी करत आहोत.
आजचाच तो 12 जानेवारी 1598 चा दिवस जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखोजीरा जाधवाच्या घरात जिजाऊ जन्मल्या पुढे विदर्भातल्या जाधवाची लेक मराठवाड्यातल्या भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाली.
मित्रहो निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मोठमोठे पराक्रमी मराठी सरदार या बादशहाच्या दरबारी चाकरी करण्यात धंन्यता मानीत होते. अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कुणाची हिंमत नव्हती. अशा कठीण काळात स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याच स्वप्न मासाहेबांनी पाहिलं.
मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी कोवळ्या वयातच शिवरायांमध्ये स्वराज्याचा स्वप्न पेरलं.अठरापगड जातीतील मावळे आणि जीवाला जीव देणारे साथीदार सोबतीला घेऊन महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वप्न सत्यात उतरवलं. म्हणूनच जिजाऊंना स्वराज्य जननी म्हटले जाते.
मासाहेबांनी संस्कारातून राजकारण समाजकारण आणि नीतिमत्तेचे धडे शिवरायांना दिले आणि शिवरायांनी गोरगरीब जनतेचा जाणता राजा काय असतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले. अन्यायावर वार केला, मंदिरांचा जीर्णोद्धार केला,’ आणि महाराष्ट्राचा उद्धार केला.
मासाहेब जिजाऊ म्हणजे
मंदिराचा उंच कळस
अंगणातली पवित्र तुळस
भजनात गुणगुणावी अशी व संतवाणी
वाळवंटात प्यावे असे थंड पाणी.
ज्यांनी फक्त शिवराय घडविले नाहीत तर संभाजी महाराज नावाचा वाघाचा छावा सुद्धा घडविला.
अशी आदिशक्तीचे रूप असलेली स्वराज्य माता महाराजांच्या राज्याभिषेका नंतर केवळ अकरा दिवसांनी 17 जून 1674 रोजी स्वराज्याला सोडून गेल्या.आनंतात विलीन झाली. मित्रहो आजची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असे वाटते म्हणूनच शेवटी एवढेच म्हणेन…
घडविण्या अजेय तो महाराष्ट्राचा विधाता…..
पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता…….








