२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन सोपे भाषण marathi bhasha gaurav din bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन सोपे भाषण marathi bhasha gaurav din bhashan 

मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, लेखन, काव्य, साहित्यसंपदा आणि सांस्कृतिक वारसा यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि विविध सांस्कृतिक संस्थांमध्ये मराठी कविता वाचन, काव्यसंमेलन, निबंध स्पर्धा, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेचा अभिमान जपत तिचा प्रचार-प्रसार आणि जतन करण्याची प्रेरणा देणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…”

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या सर्व माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज मराठी भाषा गौरव दिन विषयी दोन शब्द माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी नम्र विनंती करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस होय.

‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस अत्यंत खास आहे. थोर साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्यांच्या लेखणीने मराठी साहित्याला सुवर्णकाळ दाखवला, त्या विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या लाडक्या ‘कुसुमाग्रजांचा’ आज जन्मदिन. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि आपल्या मायबोलीचा गौरव करण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत.

मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपली ओळख आहे. ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदानाने’ संस्कारित झालेली, तुकोबांच्या ‘अभंगांनी’ रसाळ झालेली आणि छत्रपती शिवरायांच्या ‘हुंकाराने’ तळपलेली ही आपली मराठी भाषा आहे. ही संतांची भाषा आहे, ही वीरांची भाषा आहे आणि ही विचारांची भाषा आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण इंग्रजी शिकलो पाहिजे, जगाशी स्पर्धा केली पाहिजे, यात शंकाच नाही. पण हे करत असताना आपल्या आईची जागा जशी दुसरी कोणी घेऊ शकत नाही, तशीच आपल्या ‘मायबोलीची’ जागा इतर कोणत्याही भाषेला देऊ नका. मराठी बोलताना आपल्याला न्यूनगंड वाटता कामा नये, उलट ‘मी मराठी बोलतो’ याचा सार्थ अभिमान आपल्या उरात असायला हवा.

कुसुमाग्रज म्हणायचे, “मराठी भाषा ही वाघिणीचे दूध आहे आणि ती पिणारा माणूस कधीच लाचार होऊ शकत नाही.” आज गरज आहे ती आपली भाषा जपण्याची आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची. आपण मराठी वाचली पाहिजे, मराठी लिहिली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त मराठी बोलली पाहिजे.

आपल्या भाषेला आता ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला आहे, हा आपल्या सर्वांचा विजय आहे. पण खऱ्या अर्थाने भाषेचा गौरव तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात तिचा सन्मानाने वापर करू.

मराठी आमची मायबोली, तिचा आम्हा अभिमान, तिच्याच पायी वाहू आमचे, हे जीवन आणि प्राण!”

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते.

Related posts:

Leave a Comment